Sunday, February 16, 2014

तेरूओ आणि काही दूरपर्यंत………...गौरी देशपांडे

तेरुओ आणि काही दूरपर्यंत , या दोन लघु कादंबर्या आहेत गौरी देशपांडेंच्या . 
मुळातच गौरी देशपांडेंच्या प्रत्येक कथेची सूत्रधार म्हणा वा मुख्य पात्र म्हणा ही कायम एक स्त्रीच असते. 
विविधतेने नटलेली स्त्री पात्रे तीही परिस्थितीनुरूप स्व:ताला सक्षम करणारी वा दाखवणारी वा …। 
रुढीना तोडून वा डावलून जीवन जगणारी नायिका नेहमीच खास असते. तिच्या जगण्याचे मूल्य वेगळेच. ती कधी आपलीशी वाटते, कधी तिच्यातच प्रतिबिंब दिसते , कधी तिचा हेवा वाटतो कधी थोडी नाराजीही. पण इतके होऊनही तिचा साथ सोडावासा वाटत नाही. 
तेरुआ आणि काही दूरपर्यंत ह्या दोन्ही कथा आपापला साज घेऊन आलेल्या, वेगळ्या घाटणीच्या. शब्दांमध्ये अडकलात तर कधी न कळणार्या. पण सावध राहून एखाद्या  शब्दाला पकडता म्हणण्यापेक्षा उमजता आले तर त्या गवसलेल्या. 
दोन्ही लघु कादंब-या १९९० च्या दशकातल्या तरी आजच्याच वाटणा-यां हेच सदाबहार यश म्हणावे लागेल लेखिकेचे ! 

तेरुआ 
या कथेची सुरुवातच सर्व साधारण कल्पनेहून वेगळी. कथेच्या नायिकेला नाव नाही आणि त्याची गरजच भासत नाही. 
"कुठल्याही घडलेल्या घटना,मनात आलेले विचार, पडलेली स्वप्न , केलेली मनोराज्य असं काही सांगायचं म्हंटलं  की त्यांना  बांधणारी एक काळाची चौकात तयार होते; तसं  काही विशेष कारण नसताना त्याना एक सुस्त्रता येते; एक आधी घडलं , तर एक मागाहून, असा क्रम निर्माण होतो; गोष्टी जिथे घडल्या त्या ठिकाणांच वैशिष्ट्य त्याच्यात उतरतं;आणि तशातच व्यक्तींना नावं  व रंगरूप दिल की सांगणा-याच्या मनात असते त्याहून निराळीच आकृती ऐकणा-याच्या डोळ्यासमोर उभी राहते . " 
असे सुरुवातीलाच स्पष्ट करून नायिका "मी" म्हणून समोर येते. आणि मग आपणही मी म्हणूनच कथेबरोबर समोर वाहत जातो. 
तिची डायरी म्हणावी तर त्यात वर्ष तारीख काहीच नाही …. फक्त जपान मध्ये घालवलेले तिचे महिने. तेही एक वर्षाचा शेवट होऊन नव्या वर्षाकडे आगेकूच करणा-या डिसेंबर महिन्याने … मग त्या पाठेपाठ येणारी पत्रे कधी ती"तेरुआ" नाहीतर कधी  "जी" ना लिहिलेली. जी ना लिहिलेली पत्रे त्यांच्या  पर्यंत पोहोचलीच असावीत पण तेरुआला लिहिलेली पत्रे त्याला पाठवली असावीत का हा प्रश्न मनात रहातोच. 
"मी" जनक अर्थात नवा-याबरोबर जपान मध्ये आलेली , विविध देश फिरून त्यांचा अनुभाव म्हणण्यापेक्षा आस्वाद घेऊन आलेली. 
ती स्वछंदी  नाही आहे पण एखादी गोष्ट आवडली तर त्यावर निस्सीम प्रेम करणारी , भक्ती करणारी …. पण त्यात अडकून वा गुंतून न पडणारी . असं  खरच जगता येत का? कदाचित येत असाव , जेव्हा सभोवतालची आवरणं  बाजूला सारून , जे आवडत ते मान्य करण्याच धाडस वा कबुली ते ही स्व:ताशी देता आली तेव्हा असं  नक्कीच जगता येत असावं . 
जनक आणि तिच्यात  नुसता बंध आहे नात्याचा , आधी केलेल्या प्रेमाचा आणि आताही ती करत असलेल्या  unconditional प्रेमाचा (?) . 
जपान मध्ये आल्यावर तिला या अनोख्या देशातील अनोख्या लोकांचा त्यांच्या लोकमान्य प्रथित रिवाजांचे नावलाही वाटते. कधी हिंदुस्थानाला रूढीवादी म्हणणारी क्षणभर जपानी लोकांच्या वागण्यामुळे चकीत होते. पण ती अशा गोष्टीत अडकत नाही . म्हणूनच ती प्रथामादार्शीच तेरुआच्या प्रेमात पडते …। तिचे हे प्रेमात पडणे अल्लड  वयातले नाही तर चक्क चाळीशीच्या आसपास पोहचल्यावर जडलेले प्रेम ते ही पहिले वाहिले नाही .  ती ते तेरुआपासून लपवूनही ठेवत नाही