Thursday, April 19, 2012

अज्ञात झ-यावर रात्री.....अरुणा ढेरे

अज्ञात झ-यावर रात्री हे पुस्तक दुस-यांदा वाचले.
पहिले कॉलेज मध्ये असतांना वाचले होते आणि आता परत.
जेव्हा एखादी कलाकृती आपण दुस-यांदा अनुभवतो तेव्हा तिची अनुभूती ही पहिल्या पेक्षा निश्चितच वेगळी असते. ह्या पुस्तकाच्या बाबतीतही हे तंतोतंत लागू होते.
हे पुस्तक म्हणजे १५ पूर्वप्रसिद्ध लघु कथांचा संग्रह.
पुस्तकाच्या सुरुवातीलाच अरुणा ढेरे प्रत्येक कथेची पार्श्वभूमी सांगतात. अरुणा ढेरे ह्या आपल्या प्रत्येक लिखाणातून स्त्री ह्या भूमीकेकडे एका वेगळ्या दृष्टीकोनातून पहातात. त्यामुळेच कदाचित त्यांचे लिखाण मला कायम आवडते. महाभारतातील स्त्री पात्रांबद्दल असलेली त्यांची ओढ ह्या पुस्तकातील कथांमध्येही दिसून येते. त्याच बरोबर संत स्त्रियांच्या आत्मशोधाचा मागोवा घेणा-या काही कथा समर्थपणे उभ्या रहातात आपल्यासमोर. तर काही लोककथा नव्याने जन्म घेतात.
मनोगतात त्यांनी सहजतेने सांगितले आहे,"एका परीने या संग्रहातल्या कथांमधून नव्या आणि जुन्या स्त्रीचे जगणे मी शोधते आहे. माझ्या जवळची , अनुभव , आणि समाज यांची पुंजी तशी फार मोठी नाही. पण बाल आहे ते तिचेच आहे. वाटते की, अतिदीर्घ आणि अतिविस्तृत असा काल आपल्यापुढे पसरला आहे.आजचे आपण - माणूस म्हणून, बाई म्हणून या काळाच्या हातून काही स्वीकारतो, काही नाकारतो. काही पेटत हाताने शोषतो, काही निर्धाराने गिळून टाकतो. या कथा म्हणजे त्या स्वीकार - नकाराच्या, 
शोषण्या- गिळण्याच्या  आहेत, असे म्हटले तरी चालेल."

पहिली कथा "पूजा" , या कथेची चौकट तंजावरच्या प्रसिद्ध बृहदिश्वर मंदिराशी निगडीत आहे. या मंदिराच्या कळसाची तळी गावातल्या एका वृद्धेच्या  दारातल्या शिलेची घडवलेली आहे. खुद्द बृहदिश्वारानेच नगराधिपती  राजाला स्वप्न दृष्टांताने त्याबाबतची आपली पसंती कळवल्याची स्थळ माहात्म्य कथा या कथेचा आधार आहे.
जयाम्माची सून पद्मा,  नवरा विश्वनाथ १२ वर्षापासून नाहीसा झालेला , कुठे गेला , का गेला याची कोणालाही खबरबात नाही. पद्मा नेमाने आपले कर्तव्य पार करत  एक सवाष्ण असूनही सन्यस्त जीवन जगत आलेली. त्या सन्यस्त जीवनाचे तेज तिच्या चेह-यावर दाटलेले. मनापासून शिवाच्या पूजेत रमून जाणारी जयाम्माची लाडकी सून.
घराच्या दारातली शिला बृहदिश्वाराच्या मंदिराच्या कळसाच्या तळी साठी योग्य ठरल्यापासून जयाम्माचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. अखेर शिवाने आपली प्रार्थना ऐकली आणि आपली पूजा सार्थकी लागली असेच तिला मनापासून वाटत होते. शेवटी कोणाची पूजा फळते हे इतक्या सहजतेने कथेत गोवले गेले आहे.

दुसरी कथा : अज्ञात झा-यावर रात्री.  रजू आणि रमा यांची आपली एकेकटीची व्यथा, एकमेकात गुंतून ही कथा समोर येते. १० वर्षानी एकमेकीसमोर समोर येणा-या  मैत्रिणी , वेगवेगळ्या मार्गावर आगेकूच झालेल्या, शेवटी एका वळणावर एकमेकीना भेटलेल्या. इतक्या दूर असूनही दोघीन्च्याही अंतरंगात समजुतीचे झरे झुळकत असणे ही एका अतूट बंधनाची / मैत्रीची ग्वाही देणारे. आणि ग्रेसच्या ओळीच्या गर्भित ओळींचा ओलावा जाणणारे  हे कथानक.कथा वाचल्यावाराही  ओळी मनात गाज देत रहातात 
" मन कशात लागत नाही, अदमास कशाचा घ्यावा ?
अज्ञात झा-यावर रात्री मज ऐकू येतो पावा ...."

तिसरी कथा " की आपुला ठावो न सांडिता "

की आपुला ठावो न सांडिता । आलिंगिजे चंद्रु प्रकटिता ।
ऐसा अनुरागु भोगिता । कुमुदिनी जाणे ।।

शाब्दिक अर्थाच्या  मागे धावताना अर्थ कधीच गवसत नाही. काही अर्थ हे अनुभावान्च्या अनुभूतीतूनच येतात. ह्या कथेचा परीघ असाचा विस्तृत आहे. क्षणभर ह्या कथेचे पात्र अजिता ह्या परीघाची परिसीमा जाणून न घेता आपल्याभोवती परीघाची मर्यादा  रेषा आखते तर जेव्हा सगळ्या गोष्टीन्मागचा अर्थ गवसू लागतो तेव्हा प्रत्येक नातातल्या  परिवर्तनाची उकल तिला होते.ह्या मार्गात वाटाड्या बनतात ते नाना आजोबा.

उमज -- चौथी कथा,

परिस्थिती सगळ काही शिकवते. पण सगळ्या गोष्टी उमजेपर्यंत एका आधाराची आवश्यकता ही लागते.  प्रत्येक झाड हे स्वयंभू वाढत नाही. एका विशिष्ट उंची पर्यंत यायला एखाद्या  झाडाला  आधार लागतो. 
अशीच काही अवस्था सांगणारी ही कथा. जयंत - बिंदा , आणि जयंत - गिरीजा यांच्या नात्याचा ठाव घेते.
जयंत हा आधार आहे तर बिंदा एक स्वयंभू तर गिरीजा आधार शोधणारी. एका वळणावर तिच्या ह्या अवलंबून असण्याच ओझ जयंताला वाटते. त्या ओझ्याला नाकारायाचीही हिम्मत म्हणण्यापेक्षा ,त्याला गिरिजाला दुखवायचे नाही. गिरिजाला जेव्हा स्व:ताच्या कार्यक्षमतेची जाणीव होते तेव्हा तीच स्व:ता हे ओझ हलके करते. 

"धुकं "
पिढीच अंतर , आजी नाती मधल्या नात्याचा सुंदर गोफ.
काळ बदलतो , घड्याळाचे काटे पुढे सरकतात , पिढी मधील अंतरे वाढतात. तरी स्वभावाची चाकोरी कधी बदलत नाही. कपडे बदलावे तसे बाह्य जग बदलते पण अंतरंग , मनुष्याचा स्वाभाविक गुणधर्म कधीच बदलत नाही.
या कथेत आजी तिच्या नातीला , अर्थात मुक्ता सहजपणे बोलून जाते ," पन्नास वर्ष उशिरा कोय लावली तरी आंबा तो आंबाच उगवायचा  मुक्ते ! "
"जग पुढे न मागे नाही. पन्नास वेळा बदला माती, पण झाड भुईवरच असत ना अन भुईचा बदल म्हणशील तर झाड तेवढा मानून घेत की नाही ? माणसाचाही तसंच असत बाई ! "
आजी   दुसरेपणाची, सासूची नावडती, सासूचे  अनेक अत्याचार सोसलेली तरी शांत . हे सोसण्याच बळ आल कुठून असा कायम प्रश्न पडलेला. आपण जी सारी शक्ती भांडणात वाया घालवतो तीच शक्ती आजीने साठवून ठेवली की काय शांत राहून ?

माती नांगरली , कडकडत उन अन बिलगणा-या पावसाचा प्रेमळ सहवासात तिला मिळाला की तिच्यात बीज चांगल रुजत. तसंच ह्या कथेतल्या आजीच. आजोबांचा प्रेमळ सहवास तिला सा-या दु:स्वासांवर मात करून जायचं बळ देतो. छळणारी सासूही शेवटी तिच्या मायेच्या सावलीत पश्चातापाने जळत - निवत जाते.

तसं पाहिलं गेल तर प्रत्येकाच्याच जीवनात परिस्थितीच धुकं दाटत, पण त्यातून सहारा देणारा वा आपुलकीचा , मायेचा जवळ करणारा स्पर्श सर्व काही सुकर, सुखकर करतो.

कथेच्या शेवटी आजी म्हणते , " माणसाचं आयुष्य असत तरी केवढ ?  एक ओवी गावी अन पैल पालखी जावी ."

सहावी कथा नात.

नंदिता , सुबोध आणि देवकी यांची. प्रेमाचा त्रिकोण.त्यातून उद्भवणारी मानसिक आंदोलने. याचाच घेतलेला  मागोवा. सरळ अपेक्षित वळणाने ही कथा संपते.

"आपण एकमेकांना "

ही कथा मनात घर करून रहाते, लग्न म्हणजे नक्की काय ? दोघांच एकमेकासोबत असण म्हणेजे काय? शरीरापलीकडे  जाऊन एकमेकांची गरज एकमेकांना असते आणि ती गरज शाररीक गरजेपेक्षाही मोठी असते. भावना, मन हे उमजल एकमेकांच तर सगळ आयुष्य सुकर बनत. छोटी मोठी वादळे आली तरी ती निभावून जातात. पण नात्यात हा ओलावाच नसेल तर ते शेवटी विस्कटत आणि तुटत. हेच सांगणारी ही कथा अवि आणि शोभा यांच्या नात्यातली परिणीती.त्याच बरोबर आबा , माई आणि सुमित्राचीही !

कधीतरीची गोष्ट.

"भुललासी   वरलीया रंगा ' असेच काही ह्या कथेतून सुचवायचे आहे.
तेजा , हट्टाने प्रेमविवाह केलेला , आता तिला तिचाच संसार निरस वाटतोय मन दुसरीकडे धावातय  आपण करतोय ते बरोबर आहे की नाही ह्याचही भान नाही , काय कराव काय करतोय ह्या शंकांच्या जंजाळात अडकलेली . दुसरीकडे रेणुका शांत सरळ वाट बघत थांबलेली. 



पानझड......ना. धो. महानोर